Sunday 3 December 2017

अर्थक्रांती भाग 9.1

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०९. संपत्तीतून समृध्दीकडे
------------------------------------------
बिल गेट्स यांच्याबद्दल समजलेली एक गोष्ट. बिल गेट्स एकदा एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर त्यांनी बिल दिले. त्यानंतर वेटरला ५ डॉलर टीप म्हणून दिले. तेव्हा तो वेटर म्हणाला, “तुमचा मुलगा इथे ज्यावेळेस जेवायला येतो तेव्हा ५०० डॉलरची टीप देतो. तुम्ही तर त्याचे वडील आहात. जगातील सर्वात श्रीमंत माणूस असून देखील तुम्ही केवळ ५ डॉलरची टीप दिली हे पाहून आश्चर्य वाटले.” त्यावेळी बिल गेट्स यांनी दिलेले उत्तर आपल्या खूप काही शिकवून जाते. बिल गेट्स त्या वेटरला म्हणाले, “मित्रा जो तुला ५०० डॉलरची टीप देतो. त्याचा बाप जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, मात्र मी जेव्हा टीप देतो. तेव्हा मला याची जाणीव असते की, माझा बाप एक सामान्य शेतकरी आहे.” याचा अर्थ ज्यांचे वडील श्रीमंत आहेत, त्यांनी पैसा उधळावा किंवा पाहिजे तसा खर्च करावा असा घेऊ नये, तर आपल्याला पैसा खर्च करताना सामान्य गरजांचा किंवा त्याच्या उपयोगितेचा विचार करुन केला पाहिजे याची जाणीव सतत असणे गरजेचे आहे.

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, आपण एकदाच भरपूर पैसे कमावले की, मग आयुष्यभर पैसे कमवण्याची आवश्यकता नाही किंवा काही लोक सतत पैसे कमावण्याचा ध्यास (म्हणण्याऐवजी हव्यास म्हणेन) घेऊन जगत असतात. त्यांना वाटत असते की आता आपण एवढे पैसे कमावून ठेऊया, ज्यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्या बसून खातील. त्यांना काही काम करावे लागणार नाही. मात्र हा समज निव्वळ पोकळ असल्याचे आपल्या लक्षात येईल; कारण वाढत जाणारा महागाई दर व पैशाचे कमी होणारे मूल्य याचा अंदाज घेतला तर आपल्याला समजून येईल की, १९४७ साली १०००० रुपये ही खूप मोठी संपत्ती होती. त्यावेळी १०००० रुपयात एका सामान्य माणसाला आयुष्यभर लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करता येत होत्या. सत्तर वर्षानंतर म्हणजे तीन पिढ्यानंतर १०००० रुपयात एका सामान्य माणसाचे घर एक महिना कसेबसे चालते. हा पैशाच्या मूल्यातील फरक आहे. ज्या माणसाने त्या काळात काही लाख अथवा काही करोड रुपये आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ठेवले असतील, तर ते पैसे दोन ते तीन पिढ्यांनाच पुरले नसते. या समस्येचे उत्तर किंवा कायमस्वरुपी श्रीमंतीची रहस्ये म्हणजेच समृध्दी प्राप्त करण्याचे रहस्य जाणून घेण्याआधी बिल गेट्स यांची अजून एक गोष्ट सांगतो.

बिल गेट्स यांचे पैशाबाबतचे विचार अतिशय उत्तम आहेत. ते सामान्य माणूस ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांनी कमावलेल्या संपत्तीतील बहुतांशी भाग (९० टक्क्याहून अधिक संपत्ती) ही दान करण्याचे ठरवले आहे. उरलेली संपत्ती सुध्दा ते आपल्या मुलांना देण्याऐवजी कंपनीला देणार आहेत. जेणेकरुन कंपनी सुरळीतपणे चालेल. मुलांसाठी कोणतीही संपत्ती ते पाठीमागे ठेवणार नाहीत. त्यावर त्यांचे विचार असे आहेत की, “मी सामान्य कुटुंबातून वर येऊन एवढी संपत्ती कमावू शकतो तर माझ्या मुलांना ती संपत्ती कमावण्याचे मार्ग मी सांगेन. कमावलेली आयती संपत्ती त्यांच्या हातात देणार नाही. त्यांना त्याचे पराक्रम किंवा ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली पाहिजे. ती कला त्यांना अवगत असली पाहिजे. त्यासाठी त्यांना हवे ते उत्तम शिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन देईन. त्यातून ते सुध्दा त्यांना हवी तेवढी संपत्ती निर्माण करतील.”

या गोष्टीला समांतर अशी एक म्हण आहे. ती म्हणजे, ‘एखाद्याला एकवेळचे अन्न देण्यापेक्षा त्याला अन्न मिळवण्याची कला शिकवणे कधीही उत्तम’ किंवा एखाद्याला मासा देण्याऐवजी मासेमारी शिकवणे अधिक उत्तम. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीच्या हातात पैसा देण्याऐवजी पैसे मिळवण्याचे तंत्र किंवा रहस्ये देणे अतिशय उत्तम असते. मारवाडी माणूस आपल्या मुलाला व्यवसाय कसा करायचा त्याची रहस्ये समजावून सांगतो, त्यामुळे प्रत्येक मारवाड्याकडे उत्तम पैसे असतात. भारतभरातील प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जाऊन या मारवाडी लोकांनी त्यांच्या लघुद्योगातून पैसा निर्माण केला आहे. मारवाडी समाजात शिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी सुध्दा त्यांना व्यावहारिक ज्ञानाचा व व्यावसायिक शिक्षणाचा अभाव निर्माण होत नाही, ते त्यांना घरातूनच दिले जाते. उद्या या संपत्तीतून समृध्दीकडे जाणाऱ्या वाटा जाणून घेऊ. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #मनी #BillGates #बिलगेट्स #Business

No comments:

Post a Comment